तर शरद पवारांचा सल्ला घेऊ   

देवेंद्र फडणवीस यांचा टोला 

पुणे : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये कुठलीही ओढातान सुरू नाही. कदाचित असे झाल्यास किंवा अडचण वाटल्यास शरद पवार यांचा निश्चितच सल्ला घेऊ, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लगावला.  पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. पुण्यात भाजपाच्या कामगार आघाडीच्या अध्यक्षांनी महिला अधिकार्‍यांसोबत चुकीचे वर्तन केले होते. त्या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली. मात्र, त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. महापालिका आयुक्तांनी त्याला महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे. 
 
याबाबत फडणवीस म्हणाले, कुठल्याही पक्षाचा कुणी असेल, चुकीचा वागेल किंवा कायदा मोडेल तर या राज्यामध्ये त्याला सोडणार नाही. सरकार त्याच्यावर कारवाई करेल.पुढे ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे प्रस्ताव सरकारकडे जसे येत आहेत, त्याचा विचार करून त्यांना मदत दिली जात आहे. ही प्रक्रिया कधी बंद होत नसते. सरकार त्याचा गांभीर्याने विचार करीत असतो. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत फडणवीस म्हणाले, दोघांचे दोन पक्ष आहेत. दोघेही भाऊ आहेत. त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. त्यांचा काय संवाद सुरू आहे, ते मला माहित नाही. मला याबाबत काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण त्यांच्यात सध्या ’बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही सुध्दा पडू नका, असा मिश्किल टोलाही लगावला. काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात लेख लिहून भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात लेखाचे उत्तर लेख लिहूनच देणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. 

Related Articles